सिक्कीमची एक वेगळी सफर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बंजारा' चित्रपट

Banjara Movie : कशा प्रकारे तीन मित्र सिक्कीमीला जाण्याचा त्यांचा प्रवास सुरु करतात. ती मजेशीर गम्मत आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 15, 2025, 06:08 PM IST
सिक्कीमची एक वेगळी सफर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बंजारा' चित्रपट title=
(Photo Credit : Social Media)

Banjara Movie : मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 16 मे रोजी हा चित्रपट सिक्कीमची सफर घडवतानाच मैत्रीचीही अनोखी सफर घडवणार आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्नेह, सक्षम आणि आदित्य हे तीन मित्र प्रवासाला निघालेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाबद्दची उत्सुकता, आत्मविश्वास झळकत आहे. पोस्टरमधून 'बंजारा' हा केवळ साहसी प्रवास नसून तो भावनिक आणि मानसिक पातळीवर बदल घडवणारा, स्वतःचे स्वप्न जगण्याची प्रेरणा देणारा प्रवास असल्याचे अधोरेखित होतेय. या तीन मित्रांचा हा प्रवास त्यांच्या मैत्रीला एक अनोखी दिशा देणारा असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांसाठीही 'बंजारा' हा एक अद्भुत अनुभव ठरणार आहे. 

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात,"ही खरंतर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं स्नेह दिग्दर्शनात पदार्पण करत असून अभिनयही करत आहे आणि त्याच्या या चित्रपटाची निर्मिती करण्याची संधी मला मिळत आहे. यापेक्षा आनंददायी काय असू शकते. यानिमित्तानं भरत आणि सुनील या माझ्या मित्रांसोबत बऱ्याच काळानं मला एकत्र कामही करता आले. मुलगा म्हणून नाही परंतु स्नेहनं या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात दडलेल्या स्वप्नांचा शोध घेणारा असून प्रवासप्रेमी, साहसी व्यक्ती आणि निखळ मैत्री अनुभवणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'बंजारा' एक खास भेट ठरणार आहे. 

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, 'यापूर्वी मी सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'बंजारा'च्या निमित्तानं मी दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. यासाठी मी बाबा, सुनील बर्वे आणि भरत जाधव यांचे विशेष आभार मानेन. कारण त्यांचा अनुभव आणि सहकार्य मला चित्रपटासाठी लाभले आहे. माझ्या या प्रवासात मला त्यांची खूप मदत झाली. तसेच माझे सहकलाकार सक्षम आणि आदित्य यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. मुळात आमचा वयोगट सारखा असल्याने हा चित्रपट आम्हाला जगता आला. आम्ही ही केमिस्ट्री प्रेक्षकांना पडल्यावर दिसेलच.'

हेही वाचा : 'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार

वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे याने केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत.