तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, शरद पवार यांनी व्यक्त केली भीती

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून शरद पवार यांची उपस्थिती

Updated: Apr 22, 2022, 06:12 PM IST
तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, शरद पवार यांनी व्यक्त केली भीती title=

विशाल सवने, झी मीडिया, उदगीर : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होत आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून शरद पवार उपस्थित होते . त्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता विशिष्ट विचारांची साहित्य निर्मिती करणाऱ्या आणि त्यास सहमती देणाऱ्या साहित्यिकांवर तोफ डागली.

साहित्यिकांनी डोळ्यात तेल घालावं
"आज काल ठराविक विचारधारेला पोषक साहित्य निर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रोपोगंडा साहित्य निर्मिती निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरचे माईन कान्फ पुस्तक आणि माध्यमांद्वारे केलेला प्रोपोगंडा हे त्यांचे गंभीर उदाहरण आहे. आपल्या देशात सुद्धा प्रोपोगंडा फैलवताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि रसिकांनी डोळ्यात तेल घालणं गरजेचं आहे". असं म्हणत पवारांनी नाव न घेता सरकारवर टीका केली.

तर चौथा स्तंभ कोसळेल
"राज्यकर्ते थेट प्रोपोगंडा करत नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी कॉर्पोरेट जगताची मदत घेतली आहे. चित्रपट श्रेत्रात तर अशा प्रोपोगंडाची थेट एंट्री झालीय. साहित्यात सुद्धा कॉर्पोरेटीकरण झाले आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही" अशी भीती सुद्धा पवारांनी व्यक्त केली.