येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राजीव कासले | Updated: Mar 8, 2024, 04:48 PM IST
येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल title=

Loksabha 2024 : मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. येणारी लोकसभा निवडणूक ही वाघ विरुद्ध लांडगे अशी होणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी कळंबमधल्या सभेत म्हटलंय. ही लढाई गद्दार विरुद्ध इमानदार अशी आहे, राम राम करून नुस्त घंटा वाजवणारे आमचे हिंदूत्व नाही,  देवेंद्र फडणवीस तुम्ही जाहीर करा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री आहात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांनी सांगितला किस्सा
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी केलेल्या फोनचा किस्सा सांगितला. 'उद्धवजी आप को आना होगा' असा फोन करत 2019 मध्ये मध्य मला बोलावलं वाराणसीमध्ये भाजपाचा प्रचार करण्यासाठी. आता भाजपने पाठित वार केला. शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

महिला दिनाच्या यांच्याकडून शुभेच्छादिल्या जातायत, पण मणिपूरमध्ये जे घडलं, देशात महिला कुस्तीपटूंनी टाहो फोडला, त्यांची दखल कोणी घेतली नाही. आता कोणत्या तोंडाने महिला दिनाच्या शुभेच्छा देताय, पण आता तुम्ही शुभेच्छा घेऊ नका, आता तुम्ही काली मातेचा अवतार घेऊन या सुरांचा वध करा आणि मग महिला दिनांच्या शुभेच्या घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. 

'नार्वेकर लबाड'
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकर हे लबाड आहेत, उमेदवारीसाठी त्यांना आमच्याविरोधात निकाल द्यायला लावला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल विरोधात वाटत नाही का? असा सवाल सुप्रीम कोर्टानेही उपस्थित केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

गरज असतांना मातोश्री, गरज संपली की अदानी, भाजप हा वापरून फेकून देणारा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे आमचं कुटुंबिय होतं, पण संकटकाळात ज्यांनी मदत केली त्यांना भाजपात संपवण्याचं काम सुरु आहे. नितीन गडकरी यांना अद्याप लोकसभेचं तिकिट देण्यात आलेलं नाही, पंकजा मुडेंबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.  पंकजा मुंडे यांच्या विरोधात मी उमेदवार उभा केला नव्हता, आता मुंडेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम भाजपकडून सुरु असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

संजय राऊत यांचा टोला
उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवरून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केलीय. गडकरी नागपुरातून 65 टक्के मतांनी निवडून येतील असा दावा बावनकुळेंनी केलाय. मात्र, 
बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकत नाही, ते नितीन गडकरींना काय तिकीट देणार असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे नेते असले तरी दिल्लीतून त्यांना नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय असं विधान वडेट्टीवारांनी केलंय. गडकरींनी मविआत येऊन लढावं त्यांना निवडून आणू असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यावर राजकारणात असे वक्तव्य केले जातात, ते येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊन असं त्यात काही नसतं. असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.