महाराष्ट्रातील सातारा गावातील 'अजिंक्यतारा' हा किल्ला कायमच आकर्षणाचा विषय असतो. प्रतापगडापासून फुटलेल्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा हा किल्ला उभारलेला आहे. 4400 फूट उंच असलेला अजिंक्यतारा 600 मीटर परिसरात विस्तारलेला आहे. या किल्ल्याला मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून संबोधल जातं.
साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने 1990 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते.या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला.
1699 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700 च्या पहाटे मुघलांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि 21 एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण 'आझमतारा' झाले.
मुघलांच्या स्वाधीन असलेला अजिंक्यतारा 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी फितवून हा किल्ला पुन्हा घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करुन घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला 11 फेब्रुवारी 1818 हा अजिंक्यतारा किल्ला इंग्रजांकडे गेला.
2021 मध्ये अजिंक्यताऱ्यावर स्वच्छता मोहिमेत एक ब्रिटीशकालीन लोखंडी तिजोरी आढळून आली आहे. ही तिजोरीअंदाजे 100 ते 125 किलो वजनाची असण्याची शक्यता असून तिजोरीची बांधणी लोखंडी किंवा पोलादाच्या पत्र्यापासून केली असावी. 1818 मध्ये मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर किल्ले अजिंक्यताऱ्याचा ताबा ब्रिटीशांकडे आला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ल्यावर ब्रिटीशांचा ताबा होता.
ब्रिटीश फौजेनं बंदुकीच्या काडतूसे ठेवण्यासाठी या लोखंडी पेट्या खास आयात केल्या असाव्यात. ही पेटी ब्रिटिशकालीन आर्म बॉक्स म्हणजे बंदुकांची काडतुसे ठेवण्यासाठी असावी, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला होता. पण कालांतराने संशोधनासाठी ही पेटी बाहेर काढली तेव्हा अर्धवट 30 अंशाच्या कोनात उघड्या अवस्थेत होती आणि पेटी कौलांचे तुकडे व मातीने भरलेली होती. ही लोखंडी पेटी स्वच्छ केली असता तिची वेगळ्या अशा भक्कम बांधणीमुळे या पेटीचे नेमके प्रयोजन लक्षात येत नव्हते. 1818 मध्ये मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर किल्ले अजिंक्यताऱ्याचा ताबा ब्रिटिशांकडे आला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ल्यावर ब्रिटीशांचा ताबा होता.
अजिंक्यतारा हा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक मार्गांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते. तसेच तुम्ही दुचाकीने सुद्धा अजिंक्याताऱ्यावर जाता येते . सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर 10-15 मिनिटाला उपलब्ध आहे. ’राजवाडा’ बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास 10 मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने असलेल्ली वाट गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते. व त्या रस्त्याने 1 कि.मी. चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्तासुद्धा आहे. गोडोली नाका परिसरातून देखील गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. आपण या रस्त्यावरूनसुद्धा थेट गडावर जाऊ शकतो. कोणत्याही मार्गाने गड गाठण्यास साधारण 1 तास लागतो.
(सौजन्य माहिती - विकिपीडिया)