'महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री...', ठाकरेंच्या सेनेकडून 'तत्काळ हकालपट्टी'ची मागणी

Devendra Fadnavis Cabibnet Ministers: महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री हे गावगुंडांसारखे वागत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 17, 2025, 08:01 AM IST
'महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री...', ठाकरेंच्या सेनेकडून 'तत्काळ हकालपट्टी'ची मागणी title=
ठाकरेंनी केली टीका

Devendra Fadnavis Cabibnet Ministers: "महाराष्ट्रास यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे अशा निष्पक्ष मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. राज्याच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विकास निधीवर ते भुजंगासारखे बसले नाहीत. त्यामुळेच आजचा विकसित महाराष्ट्र दिसत आहे. काँगेसमध्ये या, राष्ट्रवादीत या, शिवसेनेत या, तरच तुमच्या गावाचा विकास होईल, अशी पक्षपाती भूमिका कधीच कोणी घेतली नाही. मात्र सध्याचे मंत्री आज ग्रामपंचायती, सरपंच व जनतेला धमक्या देऊ लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे गंगास्नानही अपवित्र ठरले," असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. सरकारी निधी पाहिजे असेल तर भाजपात या, महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक रुपयाही देणार नसल्याचा फूत्कार फडणवीस सरकारातील मंत्री नितेश राणे यांनी सोडला आहे, असा संदर्भ देत 'सामना'मधून टीका करण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या घरात पैशांची खाण असली तरी...

"मोदी म्हणतात, ‘‘सबका साथ, सबका विकास’’ आणि त्यांचे महाराष्ट्रातील मंत्री म्हणतात, ‘‘जो आपले बूट चाटेल त्याचाच विकास.’’ लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थानही तोलामोलाचे आहे. निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले म्हणजे तुम्ही राज्याचे मालक होत नाही. सरकारी तिजोरी ही मंत्र्यांच्या घरची तिजोरी नाही. जनतेच्या कराचा पैसा तिजोरीत जमा होतो व त्यातूनच विकास निधीचा प्रवाह सुरू होतो. मंत्र्यांच्या घरात पैशांची खाण असली तरी त्या खाणीतला दमडाही विकास निधीत जमा होत नाही, मग मंत्री कोणत्या मस्तीत ही माजोरडी भाषा करून आपणच सरकारी तिजोरीचे बाप असल्याचे सांगत आहेत?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

अशा मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करून...

"महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री हे गावगुंडांसारखे वागत आहेत. जातीधर्मांना लक्ष्य करून धमक्या देत आहेत व आता थेट मतदारांना धमक्या देऊ लागले आहेत. मोदी यांनी परदेशात जाऊन लोकशाहीचे ढोल ट्रम्प यांच्यासमोर वाजवले व त्यांच्याच पक्षातले ‘बाटगे’ मंत्री लोकशाहीची हत्या सरकारी पैशाने करीत आहेत. अशा मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करून लोकशाही व संविधानाची प्रतिष्ठा राखली पाहिजे," अशी अपेक्षा ठाकरेंच्या पक्षाने व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> 'मंत्री कोणत्या मस्तीत माजोरडी..'; नितेश राणेंवरुन ठाकरेंची सेनाचा हल्लाबोल; म्हणाले, 'बॉस कोण हे फडणवीसांनी..'

या भागातील जनता भारत देशाची नागरिक नाही काय?

"महाराष्ट्र हा अखंड व एकसंध आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आमदार, नगरसेवक, सरपंच निवडायचा अधिकार आहे. त्याच प्रक्रियेतून मोदी हे देशाचे पंतप्रधान व फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. लोकशाहीत मते विकत घेऊन जे आमदार व मंत्री झाले त्यांना संविधानाचे मूल्य कधीच समजणार नाही. मोदी देशाच्या, राज्याच्या विकासाची बात करतात, पण जेथे भाजपचा खासदार, आमदार, सरपंच नाही ते ‘ठिपके’ ते विकासकामांपासून वंचित ठेवणार काय? या भागातील जनता भारत देशाची नागरिक नाही काय? फडणवीस, मोदी, उत्तर द्या," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.