मुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात...

Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2025, 07:25 AM IST
 मुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात... title=
mumbai news coal tandoor furnace ban in mumbai bmc send notice to all hotel

Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: ग्लोबल वार्मिंगमुळं वायू प्रदुषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावला होता. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्या बंद करणाऱ्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करुन इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. 

तंदूर रोटी, चिकन हे खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहेत. कोळशाच्या भट्टीत तंदूर भाजली जाते. मात्र आता मुंबईकरांना तंदूर रोटी खाता येणार नाही. कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसंच, तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. 

सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं या पुढे खवय्यांना तंदूर रोटी, नान आणि चिकन खाता येणार नाहीत. तसंच मुंबईची ओळख असलेला वडा-पावदेखील हरवणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेने बेकरी चालकांनादेखील नोटीस बजावली आहे. बेकरीत प्रामुख्याने पाव भट्टीत भाजले जातात. त्यामुळं बटाटावड्यासोबत दिला जाणाऱ्या पावाची ओळख हरवणार का? अशी भिती खवय्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रदूषणात वाढ झाली आहे. विशेषतः बांधकामांची धुळ आणि बेकऱ्यांसह ढाबे, हॉटेलमध्ये जळणासाठी वापरले जाणारे लाकूड आणि प्लायवूडमधून मानवी शरीरासाठी घातक असलेला विषारी वायू बाहेर पडत आहे. त्यामुळं या भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. पालिकेने केलेल्या झाडाझडतीत मुंबईत सुमारे 300 बेकऱ्यांमध्ये जळणासाठी लाकूड, प्लायवूडसारखे पदार्थ वापरले जात असल्याचे समोर आले आहे. 

कारवाईचा इशारा 

मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाबा चालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असून बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात. मात्र काही ठिकाणी अजूनही कोळसा भट्टीचा वापर केला जातो. त्यामुळं महापालिकेने याची दखल घेतली असून रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाणार आहे.