'भलत्याच विषयावर मोदींचे बोलणे व...', ठाकरेंच्या सेनेचे चिमटे; म्हणाले, 'त्यांच्या भाषणातील 99% मुद्दे...'

Uddhav Thackeray Shivsena On Modi Speech In Parliament: खोट्या कहाण्यांचे सादरीकरण करून लोकांना गंडवण्याचे हे पंतप्रधान मोदींचे उद्योग धोकादायक आहेत, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 8, 2025, 07:50 AM IST
'भलत्याच विषयावर मोदींचे बोलणे व...', ठाकरेंच्या सेनेचे चिमटे; म्हणाले, 'त्यांच्या भाषणातील 99% मुद्दे...' title=
ठाकरेंच्या पक्षाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena On Modi Speech In Parliament: "पंतप्रधान मोदी यांची भाषणे म्हणजे आगा ना पीछा अशाच प्रकारची होत आहेत. विषयांतर करण्यात आणि विषयाला सोडून बोलण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही," असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी असेच विषयांतर केले. मोदी हे आदल्या दिवशीच गंगेत डुबकी मारून आले. त्यामुळे गंगेचे पावित्र्य त्यांच्या विचारांत शिरेल व ते संयमाने बोलतील असे वाटले होते, पण संसदेत त्यांनी भलतेच विषयांतर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींना लक्ष्य केलं आहे.

बाके वाजवणाऱ्यांपैकी बहुसंख्य पूर्वाश्रमीचे काँग्रेसवालेच

"राष्ट्रपती भाषणात आपल्या सरकारचा लेखाजोखा मांडतात. भविष्यातील धोरणांचा मसुदा देतात. संसदेत त्यावर चर्चा घडते. विरोधकांकडून सूचना मांडल्या जातात. या चर्चेच्या शेवटी पंतप्रधान सगळ्या मुद्द्यांवर उत्तर देतात. ही एक परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे सरकारची चौफेर चमचेगिरीच झाली आहे आणि त्यावर सत्ताधाऱ्यांची भाषणे आणि पंतप्रधानांचे उत्तर म्हणजे उखाळ्यापाखाळ्या याशिवाय दुसरे काही नसते. विरोधकांना धडपणे बोलूच दिले जात नाही. पंतप्रधानांनी या वेळीही निराशा केली नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. "काँग्रेस आणि विरोधकांवर सडकून टीका केली. काँग्रेसने देशातील महानुभावांना बंधक बनवले. त्यांना बेड्या घातल्या. देशाला जेलखाना बनवले. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडी ‘संविधान’ हा शब्द शोभत नसल्याचे फूत्कार पंतप्रधानांनी सोडले व सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून प्रोत्साहन दिले. हे बाके वाजवणाऱ्यांपैकी बहुसंख्य पूर्वाश्रमीचे काँग्रेसवालेच होते. आपल्या स्वार्थासाठी किंवा जेलवारी टाळण्यासाठी ते अचानक मोदी भजनी लागले," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

याला जेलखाना म्हणायचे नाही तर काय?

"मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेतील पराभव आणि आणीबाणीतला अत्याचार वगैरे तेच तेच विषय पुन्हा कथन केले. मोदींच्या भाषणातील किमान 99 टक्के मुद्दे हे खोटे असतात व पुनः पुन्हा ते खोटे मुद्दे रेटून नेतात. काँग्रेसने तेव्हा जेलखाना बनवला. मग आता देशात वेगळे काय सुरू आहे?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे. "राजकीय विरोधकांना उचलून तुरुंगातच टाकले जात आहे. व्यंगचित्रकार, लेखक, कवी, नट, नकलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आज उरले आहे काय? मोदींचे व्यंगचित्र काढले म्हणून कलाकारांना तुरुंगात टाकले गेले व गजाआड सडवून ठेवले. ‘मीडिया’ मोदींनी आपल्या पायाशी बसवून ठेवला व सत्य दाखवण्यावर बंदी आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य औषधालाही उरलेले नाही. याला जेलखाना म्हणायचे नाही तर काय?" असा प्रश्न ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

मोदी यांनी संविधानाची ऐशी की तैशीच केली

"स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने संविधान निर्मात्यांच्या भावना पायदळी तुडविल्याचे दुःख मोदी यांनी व्यक्त केले. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी व त्यांच्या पक्षाला चारशे खासदारांचा आकडा पार करून देशाचे मूळ संविधान बदलायचेच होते व आजही न्यायालये, राजभवन, निवडणूक आयोग वगैरे संवैधानिक पदांवर लाचार, गुलाम मनोवृत्तीची माणसे लादून मोदी यांनी संविधानाची ऐशी की तैशीच केली. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना उचलून तुरुंगात डांबायचे. आमदार-खासदार विकत घ्यायचे. मतदार यादीत घोटाळे करून, ईव्हीएम मॅनेज करून निवडणुका जिंकायच्या व विजयाचे ढोल वाजवायचे हे कोणते नवे संविधान श्रीमान मोदी यांनी लागू केले?" असं लेखात म्हटलं आहे.

संसद कशाला वेठीस धरता

"खोट्या कहाण्यांचे सादरीकरण करून लोकांना गंडवण्याचे हे पंतप्रधान मोदींचे उद्योग धोकादायक आहेत. अमेरिकेने सव्वाशे भारतीयांना हातापायात दंडबेड्या घालून परत पाठवले. त्या अपमानावर मोदी बोलत नाहीत. कुंभमेळ्यातील मृतांच्या खऱ्या आकड्यावरही ते गप्प आहेत, पण भलत्याच विषयावर त्यांचे डोलणे व बोलणे चालले आहे. गंगेच्या पवित्र स्नानाचा नेमका काय फायदा झाला? मोदी बोलतात व भक्त टाळ्या वाजवतात. त्यासाठी संसद कशाला वेठीस धरता?"