बॉलिवूडचा फिल्ममेकर करण जोहर याचे दिग्दर्शन आणि सिनेमांना प्रेक्षक पसंत करतात. करण जोहरने भारतीय सिनेमाला अनेक ब्लॉकबस्टर हिट सिनेमे दिले आहे. सिनेमांच्या दिग्दर्शनासोबतच प्रोडक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग देखील केलं आहे. करण जोहरने केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय आहे. करण जोहरने राजामौली यांच्याबद्दल केलंलं विधान आणि त्यामागचं कारण याबाबत चर्चा होत आहे.
करणने आपलं म्हणणं पटवून देताना साऊथचे स्टार दिग्दर्शक एस एस राजामौली आणि संदीप रेड्डी वांगा यांचं उदाहरण दिलं आहे. कोमल न्हाटाने करण जोहरला विचारलं की, जेव्हा सिनेमांमध्ये लॉजिक बॅकसीटवर असते तेव्हा फ्रंट सीटवर कोण मोर्चा सांभाळत असतो? यावर करण जोहरने तात्काळ उत्तर दिलं की, कनविक्शन म्हणजे विश्वास. पुढे करण म्हणतो की, जर तुम्ही बेस्ट फिल्ममेकर्सला पाहिलं तर कळेल की, त्यांचे सिनेमा चालण्यामागे लॉजिक नाही तर विश्वास होता.
करण जोहर सांगतो की, जर तुम्ही प्रेक्षकांच्या मनात हा विश्वास निर्माण करु शकलात की, सिनेमात दाखवलेली प्रत्येक गोष्ट योग्य आहे. मग त्यामध्ये लॉजिक असो किंवा नसो, काहीच फरक पडत नाही. करण जोहरने उदाहरण देताना सांगितलं की, राजामौली सरांच्या सिनेमांचंच पाहा ना. त्यांच्या सिनेमात कुठे लॉजिक दिसतं? तुम्हाला त्यांच्या सिनेमात फक्त विश्वासच दिसेल. ज्यामुळे चाहते त्यांनी दाखवलेल्या सिनेमातील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात.
"करण म्हणाला की, अॅनिमल, आरआरआर आणि गदर यासारख्या सर्व मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी देखील हे विधान खरे ठरले आहे. जर एखाद्या व्यक्तीला फक्त एका हँडपंपाने 1000 लोकांना मारहाण करताना दाखवले असेल तर ते फक्त विश्वासाच्या जोरावर पटते. अनिल शर्मा यांना वाटते की, सनी देओल ते करू शकतो आणि परिणामी, प्रेक्षकही त्यावर विश्वास ठेवतात. आणि गदर 2 मध्ये, तो एखाद्याला स्पर्श करताच ते पळून जातात. हा शुद्ध विश्वास आहे,” तो पुढे म्हणाला.